मजुरांच्या कमतरतेमुळे मेट्रो प्रकल्पांच्या कामाचा वेग मंदावला

मजुरांच्या कमतरतेमुळे मेट्रो प्रकल्पांच्या कामाचा वेग मंदावला


ठाणे


केंद्र आणि राज्य सरकारने परप्रांतीय मजुरांना प्रवासासाठी मुभा दिल्याने यापैकी निम्म्याहून अधिक मजुरांनी त्यांचा गावाचा रस्ता धरला. त्यामुळे मुंबई, ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरातील मेट्रोची कामे मंदावली आहेत. मे महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारने टाळेबंदीच्या काळात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी प्रवास करण्यासाठी मुभा दिल्याने आणि श्रमिकांसाठी विशेष रेल्वे तसेच बसेस सोडल्यामुळे मेट्रो प्रकल्पांवर काम करणारे निम्म्याहून अधिक मजूर त्यांच्या मूळगावी परतले आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्पांच्या कामाचा वेग काही प्रमाणात मंदावला असून ही कामे वेगाने सुरू करण्यासाठी नव्या मजुरांचा शोध प्राधिकरणाने सुरू केला. यासाठी राज्यातील विदर्भ आणि मराठवाडय़ातील मराठी मजुरांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. राज्यातील ग्रामीण तसेच अर्धनागरी पट्टय़ात हाताला काम नसलेले कामगार, मजूर यांची एक यादी तयार केली जात असून पुढील काही दिवसांत या बेकारांना मेट्रो कामासाठी जुंपण्याची तयारी सुरू आहे.


महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या ९ मेट्रो प्रकल्पांवर काम करणाऱ्या साडेपाच हजार परप्रांतीय मजुरांची प्राधिकरणाने मुंबई आणि ठाण्यात विविध ठिकाणी छावण्या उभारून राहण्याची सोय केली होती. या छावण्यांमध्ये मजुरांसाठी जेवणाची व्यवस्थाही केली जात होती. डॉक्टरांच्या माध्यमातून या मजुरांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात येत होती. तसेच या कामगारांना लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा करण्याचेही नियोजन आखण्यात आले होते. टाळेबंदीच्या काळात कामगारांच्या देखभालीवर होणारा हा सर्व खर्च एमएमआरडीएच्या विविध कंत्राटदाराकडून करण्यात येत होता. या खर्चाची परतफेड एमएमआरडीएकडून करण्यात येणार होती. पुरेशा प्रमाणात कामगार उपलब्ध असल्याने प्राधिकरणाने २० एप्रिलपासून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरातील ९ मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू केली होती.